Marathi Bible Reading | Feast of Apolinaris Clodius | Friday 29th January 2021

 सामान्य काळ 

शुक्रवार 

२९ जानेवारी २०२१

संत अपोलीनारीस क्लॉडिअस सण
(महागुरू, रक्तसाक्षी)  

  आपण सर्वस्वी देवाला शरण जाऊन त्याची आपल्या जीवनातील इच्छा जाणून घेणे महत्त्वाचे आहे. देवाचे वचन समजून घेऊन  त्यानुसार आचरण करताना जीवनातील सर्व घटना सहनशीलतेने स्वीकारल्या तर शेवटी फलप्राप्ति मिळते. फलप्राप्ति म्हणजेच आपण सर्वजण देवाच्या राज्याचे वारीस बनणार आहोत, मात्र आपला विश्वास मजबूत असायला हवा.

 माणूस सर्वस्वी देवाच्या सामर्थ्यावर ! आणि कृपेवर अवलंबून आहे. माणूस बीज पेरु शकतो मात्र अंकुर फुटणे व त्याचे रुपांतर वृक्षात व फुले - फळे ह्यात होणे सर्वस्वी देवाच्या हातात आहे. बीज म्हणजेच देवाचे वचन आपण आपल्या जीवनात स्वीकारुन त्याप्रमाणे आचरण करायचे आहे. अगदी मोहरीच्या दाण्याप्रमाणे एखादे छोटेसे वचन आपल्या  संपूर्ण जीवनाचे परिवर्तन घडवू शकते.  कारण आपण सर्वजण देवाची मुले आहोत.
✝️

"माणूस जमिनीत बी टाकतो. 

तो झोपी गेला असता ते बी वाढते, 

पण हे कसे होते हे त्याला कळत नाही."

✝️

पहिले वाचन :इब्री - १०:३२-३९

वाचक :  इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन

पूर्वीचे दिवस आठवा. त्यावेळी तुम्हांला प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झगडलात. कधी विटंबना आणि संकटे सोसल्याने लोकांत तुमची अवहेलना झाली; तर कधी इतरांना अशी वागणूक मिळाली तेव्हा त्यात तुम्हांलाही सहभागी व्हावे लागले. कारण बंदिवानांबरोबर तुम्ही समदुःखी झाला आणि आपली स्वत:ची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे आणि ती टिकाऊ आहे, हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली. ह्यास्तव आपले धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे. तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ती करुन घ्यावी, म्हणून तुम्हाला सहनशक्तीची गरज आहे.

"कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे; जो येणार आहे, तो येईल, उशीर करणार नाही; माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल; तो जर माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जिवाला संतोष वाटणार नाही."

परंतु ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही, तर जिवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहोत.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  ३७:३-४,५-६,२३-२४,३९-४०

प्रतिसाद : नीतिमानांचे तारण परमेश्वरापासून होते.

१) जर तू परमेश्वरावर भाव ठेवशील आणि सदाचाराने वागशील, तर तू या देशात निवास करशील आणि सुरक्षित राहशील. जर तू परमेश्वराच्या ठायी आपले मन रमवशील, तर तो तुझे मनोरथ पूर्ण करील.

२) आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील. तो तुझे नीतिमत्त्व प्रकाशासारखे, तुझे न्यायत्व मध्यान्हाच्या सूर्याप्रमाणे उघड करील.

३) परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करतो आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे. तो पडला तरी सपशेल पडणार नाही, कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरील.

४) नीतिमानांचे तारण परमेश्वरापासून होते, संकटसमयी तोच त्याचा दुर्ग आहे. परमेश्वर त्यांना साहाय्य करतो, त्यांना मुक्त करतो आणि त्यांचे तारण करतो: कारण त्यांनी त्याचा आश्रय घेतला आहे.


जयघोष

आलेलूया, आलेलूया !

देवाने आपणांला सुवार्तेच्या द्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे.

आलेलूया !


शुभवर्तमान 

 मार्क ४:२६-३४

वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

       येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो आणि ते बी रुजते आणि वाढते पण हे कसे होते हे त्याला कळत नाही. जमीन आपोआप पीक देते. पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा. पीक तयार झाल्यावर तो लागलीच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे. परमेश्वराचे राज्य असे आहे." आणखी तो म्हणाला, "आपण देवाच्या राज्याला कशाची उपमा द्यावी अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यांमध्ये जरी बारीक असला तरी पेरल्यावर उगवून सर्व झाडाझुडपांमध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठमोठ्या फांद्या फुटतात की आकाशातील पाखरांना त्याच्या सावलीत वस्ती करता येते." असले पुष्कळ दाखले देऊन, त्याच्या ग्रहणशक्तीप्रमाणे तो त्यांना संदेश देत असे आणि दाखल्यावाचून तो त्यांच्यासमोर बोलत नसे, तथापि एकान्ती तो आपल्या शिष्यांना सर्व काही समजावून सांगत असे.

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : आपण अशा संस्कृतीत जगत आहोत जिथे जितके मोठे तितके चांगले अशी धारणा वाढीस लागत आहे. येशू मोहरीच्या दाण्याविषयी बोलतो, सगळ्या बियाण्यांमध्ये लहान परंतु मोठ्या वृक्षात रुपांतर होऊन अनेक पाखरांना आश्रय देण्याची त्याची क्षमता असते. येशूचा संदेश स्पष्ट आहे. प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरूवात छोट्या गोष्टींनी होते. हजारो मैलांच्या प्रवासाची सुरूवात एका पावलाने होते. आपल्या छोट्या आणि साधारण कृतीने आपण दुसऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणू शकतो. देवाचे राज्य सामर्थ्याने आणि भव्यतेने येत नाही तर ते साधेपणामध्ये उगम पावते. अगदी मोहरीच्या दाण्यासारखे. असे मदर तेरेजा म्हणतात.

प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझी वचने व तुझी शिकवण आत्मसात करुन तुला अनुसरण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या