सामान्यकाळातील दुसरा सप्ताह
✝️
“उपासाचा खरा अर्थ”
मठाधिकारी अँथनी १०५ वर्षांच्या प्रदीर्घ जीवनमानानंतर ख्रिस्तवासी झाले. त्यांना हॉस्पिटलमधील कर्मचारी, खाच खणणारे, खाटिक, ब्रश आणि टोपल्या तयार करणारे, ह्यांचा आश्रयदाता संत म्हणून गौरविण्यात आले आहे. अपस्मार, फिट्स येणे, मरी, त्वचा रोग इ. आजारांतून मुक्ती मिळावी म्हणून संत अँथनी ह्यांची मध्यस्थी केली जाते.
चिंतन : हजारो फुलांमधून मकरंद गोळा करणाऱ्या मधमाशीप्रमाणे ख्रिस्ती व्यक्तीने आपल्या मित्रांकडून चांगले तेच घ्यावे. कोणाकडून सौजन्य, कोणाकडून साधेपणा आणि मौन, तर कोणाकडून सहनशीलता शिकून घ्यावी. - संत अँथनी महान.
योहानाचे शिष्य व परुश्यांचे शिष्य उपास करीत असत मात्र येशूचे शिष्य उपास करीत नसत ह्याविषयी लोकांनी येशूला प्रश्न विचारला. येशूने नवा द्राक्षरस व नवा बुधला ह्यांचे उदाहरण देऊन स्पष्ट केले की जोपर्यंत प्रभू येशू आपल्या शिष्यांच्या सोबत आहे तो पर्यंत उपासाची गरज नाही, कारण उपासाचा खरा अर्थ उपवासात असणे किंवा देवाच्या सहवासात असणे.
उपास-उपवासाचा खरा अर्थ केवळ अन्नाचा त्याग करणे नव्हे तर उपवासात आपण शरीराने आणि अंतरात्म्याने प्रभूच्या सहवासात जाण्यासाठी तयारी करीत असतो. उपवासात असताना आपल्या अंतर्यामी देवाचा ध्यास लागायला हवा. शारीरिक भूक शमविण्यापेक्षा आध्यात्मिक भूक लागण्यासाठी शरीर आणि मन एकचित्त होणे गरजेचे असते. देहाला आणि अंतरात्म्याला उपवासात असतानाच खऱ्या अर्थाने देवाचा ध्यास लागू शकतो. आपल्या शरीराची भूक शमविण्यापेक्षा अंतरात्म्यात देवाच्या सहवासाची भूक लागावी म्हणून उपवास करणे गरजेचे आहे.
केवळ उपासाचे कर्मकांड न करता निर्मळ शरीराने व निर्मळ मनाने जागतिक वासनांचा त्याग करुन अर्थरुपी उपवास करता यावा म्हणून आपण प्रभूकडे कृपा मागू या.
शुभवर्तमान मार्क २:१८-२२
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"वऱ्हाड्यांबरोबर वर आहे."
एके दिवशी योहानचे शिष्य आणि परुशी उपास करीत होते, तेव्हा लोक येऊन येशूला म्हणाले, “योहानचे शिष्य आणि परुश्यांचे शिष्य उपास करतात पण आपले शिष्य उपास करत नाहीत, ह्यांचे कारण काय ?" येशू त्यांना म्हणाला, “वहऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत उपास करणे त्यांना शक्य आहे काय ? त्यांच्याबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांना उपास करणे शक्य नाही. तरी असे दिवस येतील की, त्यांच्यापासून वर काढून घेतला जाईल, तेव्हा त्या दिवसांत ते उपास करतील. कोणी कोऱ्या कपडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाही, लावले तर धड करण्याकरिता लावलेले ठिगळ त्याला म्हणजे जुन्याला फाडते आणि छिद्र मोठे होते. कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यात घालत नाही; घातला तर नव्या द्राक्षारसाने बुधले फुटतात, द्राक्षारस सांडतो आणि बुधलेही निकामी होतात; म्हणून नवा द्राक्षारस नव्याच बुधल्यात घालतात."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
✝️
0 टिप्पण्या