सामान्यकाळातील पहिला सप्ताह
शनिवार दि.१४ जानेवारी २०२३
देवसहायम् पिल्लय (जन्माच्या वेळचे मूळ नाव निळकंठ पिल्लय) ह्यांचा जन्म एका श्रिमंत नायर समाजातील कुटूंबात नत्तालम् ह्या सध्याच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील ठिकाणी २३ एप्रील १७१२ रोजी झाला होता. नायर समाजातील तत्कालीन मातृसत्ताक परंपरेत देवसहायम् पिल्लय ह्यांची जडनघडन त्यांच्या मामांनी केली, आणि लवकरच त्यांना हिंदू श्रद्धा व परंपरा ह्यांचेही ज्ञान झाले.
देवसहायम् ह्यांच्या कुटूंबावर त्रवणकोरचे राजे महाराजा मारतंड वर्मा ह्यांच्या शाही महालाचा प्रभाव होता, आणि देवसहायम् तरुणपणी महालात सेवेसाठी रुजू झाले. त्यांच्या क्षमता व उत्साह महालात दुर्लक्षीत राहिला नाही, त्यामुळे लवकरच त्यांना त्रवणकोरचे दिवण रामायन दलावा ह्यांच्या अधिकाराखाली राज्यातील घडामोडींचे अधिकृत प्रमूख म्हणून नेमण्यात आले.
ख्रिस्ती श्रद्धेत परिवर्तन:
१७४१ मध्ये एड डच नौदल कमांडर कॅप्टन युस्टाचीयस डी लॅनॉय ह्यांना डच इंस्ट इंडिया कंपनी मार्फत त्रवणकोरच्या अखत्यारीत असलेल्या कोलाचेल ह्या बंदरावर नौदलाच्या एका मोहिमेसाठी पाठवण्यात आले होते. त्रवणकोरचे सैन्य आणि डि लॅनॉय ह्यांची माणसे ह्यांच्यात झालेल्या लढाईत डच सैन्यांची हार झाली आणि त्यांची अनेक माणसे मारली गेली व अनेक कैद करण्यात आली. युस्टाचियस डी लॅनॉय, त्याचा साथीदार डोनाडी आणि आणखी काही डच सैनीक कैदेत ठेवण्यात आले.
डी लॅनॉय व त्याच्या सैनिकांना नंतर राजाकडून ह्या अटीवर अभय मिळाले की ते त्रवणकोरच्या लष्करात सेवा देतील. डी लॅनॉय नंतर अनेक लढाया जिंकून व अनेक शेजारील राज्ये त्रवणकोरला मिळवून देऊन राजाची मर्जी संपादन करून त्रवणकोर लष्करात कंमांडर बनला.
राजाच्या मर्जीत असतानात डी लॅनॉय आणि देवसहायम् पिल्लय ह्यांचा चांगला परिचय झाला. डी लॅनॉयच्या ख्रिस्ती श्रद्धेत देवसहायम् ह्यांना रसवाटू लागला आणि डी लॅनॉय कडून त्यांच्या मनात ही श्रद्धेची ज्योत प्रज्वलीत केली ज्याचे पर्यावसन १७४५ सालच्या त्यांच्या धर्मपरिवर्तनात झाले.
स्नानसंस्कार: ख्रिस्ती श्रद्धेचा स्विकार करून देवसहायम ह्यांनी वडक्कनकुलम गावातील(आताच्या तमीलनाडूतील तिरुनेलवेली जिल्ह्यातील) रोमन कॅथोलीक लॅटीन राईट चर्च मध्ये बाप्तीस्मा घेतला, जिथे येशुसंघीय धर्मगुरू मठ चालवीत असत. निळकंठ पिल्लय हे त्यांचे जन्माच्या वेळचे नाव त्यावेळी बदलून लाझर ठेवण्यात आले तरी ते त्यांच्या नावाच्या तमीळ व मल्याळम भाषांतराने बनणारे देवसहायम ह्या नावानेच सगळीकडे सुपरिचीत आहेत(ज्याचा अर्थ होतो देवाचे सहाय). तोपर्यंत त्यांचा विवाह त्रवणकोर मधील भार्गवी अम्मल ह्यांच्याशी झाला होता. पतीकडून त्यांचेही पुढे मनपरिवर्तन होऊन त्यांनीही ख्रिस्ती श्रद्घा स्विकारली. त्यांना बाप्तीसम्याच्या वेळी ग्नानापू अम्मल(ज्याचे तमीळ व मल्याळम भाषांतर तेरेसा असे होते) हे नाव देण्यात आले होते. धर्मांतरामुळे त्यांच्या गावात त्यांच्या विरुद्घ उठलेल्या रोशाच्या भीतिने तिने त्या गावचे विस्थापीत नागरीक म्हणून राहणे पसंत केले. देवसहायमच्या कुटुंबियांनीही नंतर बाप्तीसमा स्विकारला.
चर्च इतिहासकार सांगतात की, राज्यातील ब्राहामण मुख्य पुरोहीत, सामंत स्वामी, राजघराण्याचे सदस्य आणि नायर समाजाने दिवान रामायन देलावा ह्यांच्यासमोर देवसहायमवर चुकीचे आरोप केले. देवसहायम ह्यांना त्यांच्या सेवेतून पदच्यूत करण्यात आले आणि त्यांच्यावर राजद्रोह केल्याचा व राज्याची गुपिते प्रतिस्पर्धी युरोपीयन ह्यांच्यासमोर फोडल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यांना नंतर अटक करण्यात आली व तीन वर्षे त्यांचा छळ करण्यात आला.
वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन
आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ या.
देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव आणि आत्मा, सांधे आणि मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातले विचार आणि हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे. त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही, तर ज्यांच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे आणि प्रकट केलेले आहे.
तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे, म्हणून आपण जो पत्कर स्वीकारला आहे तो दृढ धरून राहू. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलता विषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही. तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता, तरी निष्पाप राहीला. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ या.
प्रतिसाद : प्रभो, तुझी वचने ही आत्मा आणि जीवन अशी आहेत.
१ परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहेत,
ते मनाचे पुनरुज्जीवन करते,
परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे,
तो साध्याभोळ्यांस शहाणपण देतो.
२ परमेश्वराचे नियम सरळ आहेत,
ते हृदयाला आनंदित करतात.
परमेश्वराची आज्ञा चोख आहे,
ती नेत्रांना प्रकाश देते.
३ परमेश्वराचे भय शुद्ध आहे,
ते सर्वकाळ टिकणारे आहे.
परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत,
ते सर्वथैव न्याय्य आहेत.
४ हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा,
माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द
आणि माझ्या मनातले विचार तुला मान्य असोत.
जयघोष
आलेलूया,आलेलूया !
तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे.
म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन.
शुभवर्तमान मार्क २: १३-१७
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
मी नीतिमानांना नव्हे तर पाप्यांना बोलवावयास आलो आहे."
येशू तेथून निघून समुद्रकिनाऱ्यावर गेला आणि सगळा लोकसमुदाय त्याच्याजवळ आला, तेव्हा त्याने त्यांना शिक्षण दिले. तेथून जात असताना त्याला अल्फीचा मुलगा लेवी जकातीच्या नाक्यावर बसलेला दिसला तेव्हा त्याने त्याला म्हटले, "माझ्यामागे ये," तेव्हा तो उठून त्याच्यामागे गेला.
नंतर तो त्याच्या घरी जेवावयास बसला. तेथे बरेच जकातदार आणि पापी लोकही येशू आणि त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्तीत बसले. तेव्हा त्याला जकातदार आणि पापी लोक ह्यांच्याबरोबर जेवताना पाहून परुश्यांतील शास्त्री ह्यांनी त्याच्या शिष्यांना म्हटले, "हा जकातदार आणि पापी लोक ह्यांच्याबरोबर का जेवतो?" हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, "निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते; मी नीतिमानांना नव्हे तर पाप्यांना बोलवावयास आलो आहे."
✝️
0 टिप्पण्या