सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र यिर्मया ३१:१०-१३
प्रतिसाद : प्रतिसाद : परमेश्वर आपली निगा राखील.
१. अहो राष्ट्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका; दूरच्या द्वीपांत हे प्रसिद्ध करा व म्हणा, “ज्याने इस्राएलला विखुरले तो त्यांना जमा करील; मेंढपाळ आपल्या कळपाची निगा राखतो तशी तो त्यांची निगा राखील."
२. कारण परश्वराने इस्राएलचा उद्धार केला आहे आणि त्याच्याहून जो बलवान त्याच्या हातून त्याला मुक्त केले आहे. ते येऊन सियोनच्या माथ्यावर आनंदाने गातील; परमेश्वराच्या उपयुक्त वरदानांनी ते प्रफुल्लित होतील.
३ . त्या समयी कुमारी आनंदाने नृत्य करतील. वृद्ध व तरुण एकत्र आनंद करतील. मी त्याचा शोक पालटून तेथे आनंद करीन, मी त्यांचे सांत्वन करीन, त्यांच्या दुःखानंतर त्यांनी आनंद करावा असे मी करीन.
जयघोष
आताच समय अनुकूल आहे. आजच तारणाचा दिवस आहे.
शुभवर्तमान योहान ११:४५-५७
वाचक :योहानलिखित शुभवतमानातून घेतलेले वाचन
मरियेकडे आलेल्या यहुद्यांनी, त्याने जे केले ते पाहिले आणि त्यांच्यापैकी पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला; पण कित्येकांनी परुश्याकडे जाऊन येशूने काय केले ते त्यांना सांगितले. ह्यावरून मुख्य याजकांनी व परुश्यांनी सभा भरवून म्हटले "आपण काय करीत आहो ? कारण तो मनुष्य पुष्कळ चिन्हे करतो. आपण त्याला असेच सोडले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमी लोक येऊन आपले स्थान व राष्ट्रही हिरावून घेतील.” तेव्हा त्यांच्यापैकी कयफा नावाचा कोणीएक मनुष्य जो त्या वर्षी प्रमूख याजक होता, तो त्यांस म्हणाला, “तुम्हांला काहीच कळत नाही; प्रजेसाठी एका मनुष्याने मरावे आणि सबंध राष्ट्राचा नाश होऊ नये हे तुम्हांला हितावह आहे, हेही तुम्ही लक्षात आणीत नाही." हे तर तो आपल्या मनचे बोलला नाही, तर त्या वर्षी तो प्रमुख याजक होता म्हणून त्याने संदेश दिला की, येशू त्या राष्ट्राकरिता मरणार आहे आणि केवळ त्या राष्ट्राकरिता असे नाही, तर त्याने देवाच्या पांगलेल्या मुलांनाही जमवून एकत्र करावे ह्याकरिता. ह्यावरून त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याचा आपसांत निश्चय केला. ह्यामुळे येशू तेव्हापासून यहुदी लोकांमध्ये उघडपणे फिरला नाही, तर तेथून रानाजवळच्या प्रांतातील एफ्राईम नावाच्या नगराला गेला आणि तेथे आपल्या शिष्यांसह राहिला. तेव्ह यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता आणि पुष्कळ लोक वल्हांडणाच्या अगोदर आपणांला शुद्ध करून घ्यायला बाहेरगावाहून वर येरुशलेमला गेले. ते येशूला शोधत होते आणि मंदिरात उभे राहून एकमेकांना म्हणत होते, “तुम्हांला काय वाटते ? तो सणाला मुळीच येणार नाही का?" मुख्य याजकांनी व परुश्यांनी तर त्याला धरण्याच्या हेतूने असा हुकूम सोडला होता की, तो कोठे आहे हे कोणाला कळले तर त्याने खबर द्यावी.
प्रभूचे हे शुभवर्तमान...
सर्व : हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.
चिंतन : सत्तेच्या खुर्चीखाली जेव्हा धरणीकंप सुरु होतो तेव्हा आपले स्थान बळकट करण्यासाठी सत्ताधारी खलबते करून कारस्थाने रचू लागतात. मूळ मुद्यांवरून लोकांचे लक्ष इतरत्र वेधण्यासाठी ते युक्त्या-प्रयुक्त्या करू लागतात. दंगली, जाळपोळ घडवून लोकांना वेठीस धरून त्यांना भलत्याच परिस्थितीत गुंतवून ठेवतात. अशावेळी मार्गात आडवा येणाऱ्याचा खात्मा करण्यासही ते मागेपुढे पहात नाहीत. धर्मसत्ता व राजसत्ता यामधील ढोंगी कर्मकांडावर येशू नेमके बोट ठेवीत होता. वेळप्रसंगी अशा कर्मठ व दांभिक पुढाऱ्यांची अत्यंत कठोर शब्दात तो कान उघाडणी करीत होता. धर्मशास्त्र व वैयक्तिक आचरण याबद्दल अधिकारवाणीने बोलणारा येशू जनसामान्यांचा कैवार घेत होता. त्यामुळे येशूची कीर्ती चहूकडे पोहचली होती. स्वतः कित्येक अद्भुत महत्कृत्ये करीत असताना येशूने स्वतःबद्दल 'गवगवा' केला नाही उलट परमेश्वर पित्याचे गुणगौरव गाईले. कालवारीच्या वाटेवरून हालहाल करून लोकांसमोर त्याची धिंड काढण्यात आली तरी त्याने 'पुकारा' केला नाही. न्याय, नीती, क्षमा, प्रीती याद्वारे पत्करलेला सत्याचा मार्ग तो उंच क्रुसा पर्यंत घेऊन गेला. शेवटी आज्ञाधारकपणे आपला आत्मा परमप्रिय पित्याच्या स्वाधीन करून आपले रक्त व जीवन वेचिले. अशाप्रकारे देवपित्याने त्याच्याविषयी वर्तविलेली एकूण एक भाकिते येशूने सत्यात उतरविली व आपले कर्तव्य बजावले.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्यावरील श्रद्धेत आणि तुझ्या वचनात वाढत राहण्यास व तुझी सुवार्ता पसरविण्यास आम्हाला प्रेरणा व बळ दे, आमेन.
0 टिप्पण्या