सामान्य काळातील
एकोणिसावा सप्ताह
शुक्रवार
१३ ऑगस्ट २०२१
"देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये."
संत हिप्पोलिटस व पोन्तिआतुस
धर्मगुरू, रक्तसाक्षी व परमगुरु रक्तसाक्षी (२३५)
परमेश्वराने मानवाला पुरुष व स्त्री असे निर्माण करुन नवनिर्मितीचा अद्वित्तीय आशीर्वाद त्यांना दिला आहे. 'फलद्रुप व्हा, बहुगुणित व्हा' म्हणजेच नवनिर्मितीचा महान असा आशीर्वाद देत असतानाच, नर-नारी ऐक्याची, सहभागितेची आणि एकनिष्ठेची अप्रतिम योजना परमेश्वराने उभारली आहे.
प्रभू येशूने उत्पत्तीच्या पुस्तकातील संदर्भ देऊन स्पष्ट केले की, पती-पत्नी मधील ऐक्य हा देवाच्या प्रेमाचा आविष्कार आहे. पुरुष आणि स्त्री विवाह संस्काराने एकमेकांशी व देवाशी करार करतात व देवाचा आशीर्वाद त्यांना मिळतो. म्हणूनच प्रभू आठवण करुन देत आहे की, 'देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.' ऐक्य,अखंडत्व आणि मुलांना जन्म देणे व त्या मुलांचे श्रद्धासंवर्धन करणे हे विवाहाचे प्रमुख घटक आहेत. सहभागिता व परस्पर प्रेमावर कौटुंबिक जीवन उभारलेले आहे. म्हणूनच ख्रिस्तसभा सुद्धा वैवाहिक जीवनाचे ऐक्य अबाधित राहण्यासाठी घटस्फोट निषिद्ध ठरवते.
देवनिर्मितीचा वारसा चालू ठेवून पती-पत्नी दोघांनी देवप्रीतीच्या धाग्यातून परस्पर प्रीतीचे जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील असावे. सध्याच्या परिस्थितीत अनेक विवाहित दांपत्ये शांतीने, प्रेमाने व समेटाने जीवन न जगता वेगळे होऊ इच्छित आहेत. चला सर्वांसाठी आज आपण विशेष प्रार्थना करुया.
शुभवर्तमान मत्तय १९:३-१२
वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुमच्या अंत:करणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हांला आपल्या बायका टाकू दिल्या, तरी सुरुवातीपासून असे नव्हते. "
परुशी येशूकडे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने म्हणाले, “कोणत्याही कारणावरून बायको टाकणे सशास्त्र आहे काय ?" त्याने उत्तर दिले, “तुम्ही वाचले नाही काय की, उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच नरनारी अशी निर्माण केली आणि म्हटले, ह्याकरिता पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील. ह्यामुळे ती पुढे दोन नव्हेत तर एकदेह अशी आहेत. म्हणून देवाने जे जोडले ते माणसाने तोडू नये. ते त्याला म्हणाले, मग सूटपत्र देऊन तिला टाकावे अशी आज्ञा मोशेने का दिली ?" तो त्यांना म्हणाला, "तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हांला आपल्या बायका टाकू दिल्या, तरी सुरुवातीपासून असे नव्हते. मी तुम्हांला सांगतो की, जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या • कारणाशिवाय टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो तोही व्यभिचार करतो."
शिष्य त्याला म्हणाले, "बायकोच्या बाबतीत पुरुषाची गोष्ट अशी असली तर लग्न न केलेले बरे." तो त्यांना म्हणाला, “सर्वजण हे वचन स्वीकारू शकत नाहीत. पण ज्यांना हे दान दिले आहे, तेच स्वीकारू शकतात. कारण आईच्या उदरी जन्मलेले असे नपुंसक आहेत, माणसांनी केलेले असेही नपुंसक आहेत आणि स्वर्गाच्या राज्यासाठी ज्यांनी आपणाला नपुंसक करून घेतले असेही नपुंसक आहेत. ज्याला हे स्वीकारता येते त्याने स्वीकारावे."

0 टिप्पण्या