Marathi Bible Reading | Friday 28th January 2022 | 3rd Week in Ordinary Time

सामान्यकाळातील तिसरा  सप्ताह

शुक्रवार  दि. २८ जानेवारी  २०

✝️ 
 “परमेश्वराचे राज्य असे आहे की,..."


संत थॉमस अक्वायनस
- वर्तनसाक्षी, धर्मपंडित (१२२५-१२७४)  

✝️

इटलीमधील अत्यंत खानदानी घराण्यातील राजा फ्रेडरिक दुसरा ह्याच्या कुटुंबियांमध्ये थॉमसचा जन्म झाला. वयाच्या अगदी ५ व्या वर्षी मॉन्टे कॅसिनो येथे असलेल्या बेनेडिक्टाईन संघात त्याला दाखल करण्यात आले. वयाच्या ११ व्या वर्षी नेपल्सच्या महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला आणि वयाच्या १८ व्या वर्षी तो डॉमिनिकन बनला.
परंतु त्या भिक्षुकांच्या संस्थेत दाखल होण्याबाबत त्याचे कुटुंबीय खूप नाराज होते. एका खानदानी घराण्यातील सळसळत्या रक्ताचा युवक एका भिक्षुकांच्या संस्थेत दाखल होतो हे पाहून त्याच्या कुटुंबियांत इतकी कडवट प्रतिक्रिया उत्पन्न झाली की त्यांनी दोन वर्षे थॉमसला एका टॉवरमध्ये डांबून ठेवले.
प्रेषितांच्या कृत्यांमध्ये संत पौल दमास्कसमध्ये प्रभूची सुवार्ता पसरवित होते, त्यावेळी काही ख्रिस्ती धर्मविरोधी यहुदी लोकांनी त्याला ठार मारण्याचा कट रचला असताना त्याच्या शिष्यांनी रात्रीच्या वेळी एका पाटीतून, गावकुसावरून खाली सोडले (प्रे. कृ. ९:२५). तशीच घटना थॉमसच्या बाबतीत घडली. डॉमनिकन सहकाऱ्यांनी त्याला एका टोपलीतून खाली उतरविले. तो अशा बंदिवासात असताना त्याच्या बहिणीने त्याला पवित्र शास्त्र आणि धार्मिक पुस्तके पुरविली. त्यात तत्त्वज्ञानाचीसुद्धा काही पुस्तके होती.
ह्या सर्व पुस्तकांवर थॉमस ह्यांनी इतके विलक्षण प्रभुत्व मिळविले होते की त्याला ताबडतोब संत आल्बर्ट महान ह्या धर्मपंडिताच्या मार्गदर्शनाखाली कोलोन आणि पॅरीस येथे पाठविण्यात आले. तिथे त्याच्या विलक्षण बुद्धीमत्तेवर प्रसन्न होऊन त्याला लवकरच ईशज्ञानात डॉक्टरेट ही महान पदवी देण्यात आली आणि पॅरिसच्या विश्वविख्यात विद्यालयात त्याने शिकवायला सुरवात केली.
फा. थॉमस ह्यांची शिकविण्याची हातोटी इतकी प्रभावी, प्रेरणादायी आणि अचूक होती की तिथे शिकण्यासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या ३ लाखाच्या घरात गेली. "कॅथलिक इशज्ञानांचा राजकुमार” आणि “पवित्र धर्मपंडित" अशा पदव्या संपादन केलेल्या थॉमस ह्याने अरिस्टल ह्याचे तत्वज्ञान ख्रिस्ती धर्माच्या प्रकाशात विद्यार्थ्यांना शिकविले. अशा प्रकारे बौद्धिक तत्वज्ञान ह्या क्षेत्रातील तो पारंगत प्राध्यापक म्हणून जगभर मान्यता पावला.
फा. थॉमस केवळ ४९ वर्षे जगले, परंतु ह्या अल्पायुष्यात त्याने ६० पुस्तके लिहिली. “सुम्मा थिऑलॉजिए” किंवा “ख्रिस्ती तत्वज्ञान व ईशज्ञान ह्यांचे सार" ह्या त्याच्या लिखाणाचे अनेक खंड असंख्य भाषांमध्ये प्रसिद्ध झाले. ह्या ग्रंथामध्ये त्याने ख्रिस्ती तत्वज्ञान व ईशज्ञान पुढील शब्दात वर्णन केलेले आहे : ईशज्ञान व तत्वज्ञानाचा अंतिम उद्देश देवाविषयी ज्ञान प्रसारित करणे हाच होय. तो जसा आहे तसा समजून घेणे, तो सर्व गोष्टींचा विशेषत: मानवी जीवनाचा आदि व अंत आहे. त्यामुळे आपण प्रथम देवाविषयी देवाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि शेवटी आपणासाठी मानव झालेला ख्रिस्त देवाकडे जाणारा मार्ग कसा आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.
कोणत्याही प्रकारचा अभ्यास व शिक्षण सुरू करण्याआधी संत थॉमस बराच वेळ प्रार्थना आणि मनन-चिंतनामध्ये घालवित असे आणि देवाचे सहाय्य मागत असे. तो त्याच कामामध्ये इतका गुंग होत असे की त्याने वेळेवर जेवण व झोप घ्यावी म्हणून त्याच्यावर एखादया धर्मबंधूची नेमणूक करावी लागे. बायबलमधील एखाद्या उताऱ्याचा अर्थ त्याला बऱ्याच अभ्यासानंतर जर समजलाच नाही तर तो उपवास करीत असे. त्याचा त्याला निश्चितच फायदा होई. ह्याच त्याच्या जीवनपद्धतीमुळे त्याच्यामध्ये पराकोटीचे पावित्र्य आणि उत्तुंग विचारवंत अशा दोहोंचा सुंदर मिलाफ घडवून आला.
ख्रिस्ताच्या शरीर आणि रक्ताच्या सोहळ्यानिमित्ते करावयाची प्रार्थना, मिस्सामधील प्रार्थना, उपासना आणि “तांतुम एर्गो” “ओ सालतारिस होस्तीया" ही गाणी पोपमहाशयांच्या आज्ञेवरून त्यांनी रचली.
लिओन्स येथील परिषदेसाठी जात असतानाच संत थॉमस ह्यांना अचानक मृत्यू आला. त्याला कॅथलिक विद्यापीठे, महाविद्यालये व शाळा ह्यांचा आश्रयदाता संत म्हणून गौरविण्यात आले आहे.
चिंतन: शुद्धतेहून क्वचितच आढळणारा सद्गुण म्हणजे सौम्यता. तो शुद्धतेहून निश्चितच महान होय. इतकेच काय तो सर्व सद्गुणांचा सम्राट होय, कारण परोपकार वा प्रेम ह्या दैवी सद्गुणाला तो पूरक असा सद्गुण आहे.-संत थॉमस अक्वायनस

प्रभू येशूने सांगितलेला दुसरा दाखला मोहरीच्या दाण्याचा आहे. अगदी लहान  असलेला मोहरीचा दाणा हळूहळू वाढत जातो व त्याचे रुपांतर मोठ्या वृक्षात होते. देवाच्या वचनावर श्रद्धा ठेवून ख्रिस्त सभेचा पाया अशाच बारा प्रेषितांच्या सहाय्याने उभा राहीला. आज त्याचे महावृक्षात रुपांतर झाले आहे. ख्रिस्त सभेच्या छायेत  आज असंख्य निराश्रीत विसावत आहेत. देवाचे राज्य छोट्याशा कृतीद्वारे सुरु होते व देवाच्या योजनेप्रमाणे ते बहरते व फलद्रुप बनते.

आपल्या जीवनात देवराज्याचा अंकुर वाढावा म्हणून विश्वासाने आपण आपले सर्वस्व देवाच्या हातात सोपवू या. 

✝️   

पहिले वाचन २ शमुवेलच्या  ११:१-१०,१३-१७
वाचक :शमुवेलच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन

तू मला तुच्छ मानून उरिया ह्यांची पत्नी आपली बायको म्हणून घरात आणली आहेस."

राजे लोक युद्धाच्या मोहिमेस जातात त्या समयी म्हणजे वर्षारंभी दावीदने यवाबास आणि त्याच्याबरोबर त्याचे नोकरचाकर आणि सर्व इस्राएल लोक यांना पाठवले; त्यांनी अम्मोन्यांचा संहार करुन राब्बा नगरास वेढा घातला, पण दावीद येरुशलेम येथेच राहिला.
संध्याकाळच्या समयी दावीद पलंगावरून उठून राजमंदिराच्या गच्चीवर जाऊन फिरू लागला. तेव्हा एक स्त्री स्नान करताना त्याने तेथून पाहिली. ती स्त्री दिसावयाला फार सुंदर होती. मग दावीदने चाकर पाठवून त्या स्त्रीविषयी विचारपूस केली. तेव्हा कोणी म्हटले, “ती अलियमची कन्या आणि उरिया हित्ती याची बायको बथशेबा आहे." तेव्हा दावीदने जासूद पाठवून तिला बोलावून आणले. ती दावीदकडे आली. दावीदने तिच्याशी अतिप्रसंग केला. (ती आपल्या मासिक अशुद्धतेपासून शुद्ध झाली होती.) मग ती आपल्या घरी गेली. त्या स्त्रीला गर्भ राहिला. तेव्हा तिने दावीदला निरोप पाठवला की, "मी गरोदर आहे."
दावीदने यवाबला निरोप पाठवला, “उरिया हित्ती याला माझ्याकडे पाठवून द्या." तेव्हा त्याने त्यास दावीदकडे पाठवले. उरिया दावीदकडे आला तेव्हा त्याने त्याला यवाब आणि त्याचे लोक कसे काय आहेत आणि युद्ध कसे चालले आहे हे विचारले. मग दावीद उरियास म्हणाला, “आपल्या घरी जा आणि हातपाय धू." उरिया राजमंदिरातून निघाला आणि त्याच्या पाठोपाठ राजाने त्याला काही इनाम पाठवले. उरिया आपल्या स्वामीच्या इतर सर्व चाकरांबरोबर राजवाड्याच्या दारीच निजून राहिला, आपल्या घरी गेला नाही. “उरिया आपल्या घरी गेला नाही, हे दावीदने ऐकले तेव्हा दावीदने त्याला बोलाविले. त्याने येऊन त्याच्यासमोर खाणेपिणे केले आणि त्याला त्याने दारू पाजून मस्त केले. संध्याकाळ झाली तेव्हा तो आपल्या स्वामीच्या सेवकांबरोबर आपल्या पलंगावर निजायला गेला, पण घरी गेला नाही.
सकाळी दावीदने यवाबच्या नावे पत्र लिहून ते उरियाच्या हाती पाठवले. त्या पत्रात लिहिले होते, “तुंबळ युद्धाच्या तोंडी उरियाला ठेवा आणि त्यास तेथेच सोडून मागे हटा. म्हणजे त्याला मार लागून तो मरेल. मग यवाबने नगराची चांगली टेहळणी करून जेथे शत्रूचे शूर योद्धे असल्याचे त्याला माहीत होते तेथे उरियाला नेमले. मग नगरातील सैनिकांनी बाहेर पडून यवाबशी युद्ध केले. तेव्हा दावीदच्या सेवकांपैकी काही मारले गेले, उरिया हित्ती हाही मारला गेला.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ५३:३-७,१०-११
प्रतिसाद :  कारण आम्ही पाप केले आहे.

१) हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर दया कर.
तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध पुसून टाक.
मला अधिकाधिक धुऊन माझा दोष काढून टाक, 
माझे पाप दूर करून मला निर्मळ कर.

२) मी आपले अपराध जाणून आहे,
माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे. 
तुझ्याविरूद्ध, तुझ्याविरुद्धच मी पाप केले आहे, 
तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे.

३) म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील 
आणि निवाडा करशील तेव्हा नि:स्पृह ठरशील. 
पाहा, मी जन्माचाच पापी आहे,
 माझ्या आईच्या गर्भधारणेपासून मी पापी आहे. 

४ )आनंदाचे आणि हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे, 
म्हणजे तू मोडलेली माझी हाडे कंपायमान होतील. 
माझ्या पापांपासून तू आपले तोंड फिरव, 
माझे सर्व अपराध काढून टाक.


जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
आपला तारणारा ख्रिस्त येशू ह्याने मरण नाहीसे केले आणि सुवार्तेच्या द्वारे जीवन आणले.
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क  ४ : २६-३४

वाचक :  मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 "माणूस जमिनीत बी टाकतो. तो झोपी गेला असता ते बी वाढते, पण हे कसे होते हे त्याला कळत नाही."

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो आणि ते बी रुजते आणि वाढते पण हे कसे होते हे त्याला कळत नाही. जमीन आपोआप पीक देते. पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा. पीक तयार झाल्यावर तो लागलीच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे. परमेश्वराचे राज्य असे आहे.”आणखी तो म्हणाला, “आपण देवाच्या राज्याला कशाची उपमा द्यावी अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे ? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यांमध्ये जरी बारीक असला तरी पेरल्यावर उगवून सर्व झाडाझुडपांमध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठमोठ्या फांद्या फुटतात की आकाशातील पाखरांना त्याच्या सावलीत वस्ती करता येते.” असले पुष्कळ दाखले देऊन, त्याच्या ग्रहणशक्तीप्रमाणे तो त्यांना संदेश देत असे आणि दाखल्यावाचून तो त्यांच्यासमोर  बोलत नसे, तथापि एकान्ती तो आपल्या शिष्यांना सर्व काही समजावून सांगत असे.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: येशू आजच्या शुभवर्तमानात देवाच्या राज्याविषयी बोलतो. देवाचे राज्य म्हणजे येशूच्या शिकवणीच्या अनुषंगाने निर्माण केलेले जग होय. शुभवर्तमानात वर्णन केलेला शेतकरी म्हणजे आपण सर्वजण, आपण बी पेरतो ह्याचा अर्थ देवाचे राज्य जगात पसरविण्यासाठी देवाने आपल्याला दिलेल्या आमंत्रणाला आपण दिलेला प्रतिसाद होय. आपण आपापल्या परीने आपल्या शब्दाने आणि आपल्या उदाहरणाने येशूचे विचार अवतीभवती पसरवायचे आहेत. आपल्या प्रयत्नांना कोणत्या स्वरूपात यश मिळेल, कधी फळ मिळेल हे आपल्याला नक्की सांगता येणार नाही. पण फळ निश्चित मिळेल. यश नक्की आपल्या पदरात पडेल कारण यश आणि फळ देण्याचे काम परमेश्वराचे आहे असे येशू दाखल्याद्वारे आपल्याला सांगतो. म्हणून पैशाची हाव वाईट आहे, लग्नाच्या जीवनात पावित्र्य ठेवले पाहिजे, आपल्या शत्रूंना क्षमा केली पाहिजे, खोटे बोलू नये, ढोंगीपणा टाळावा ह्या व येशूच्या इतर शिकवणीविषयी बोलताना काही माणसे आपल्याकडे उपहासाने पाहातील, प्रसंगी आपली टरही उडवतील. पण त्यामुळे घाबरून जाऊन येशूच्या शिकवणीविषयी बोलण्याचे आपण सोडून देऊ नये. येशूची शिकवण त्या त्या माणसांच्या जीवनात खमिराप्रमाणे सुप्तपणे आपले कार्य करीत राहील ह्या विषयी आपल्या मनात काडीमात्र शंका नसावी.

प्रार्थना :  हे प्रभू येशू, तुझा शब्द जाणण्यास, आचरणात आणण्यास व कृतीद्वारे  सेवा करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या