शुभवर्तमान लूक ६:३९-४५
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“मनुष्याच्या अंत:करणात जे भरले आहे तेच त्याच्या मुखातून निघते."
येशूने आपल्या शिष्यांना एक दाखला सांगितला: “आंधळा आंधळ्याला वाट दाखवून नेऊ शकतो काय? दोघेही खोल खड्डयात पडतील की नाही? शिष्य गुरुपेक्षा श्रेष्ठ नाही, पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरुसारखा होईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा तू आपल्या डोळ्यातले भुसळ न पाहता आपल्या भावाला म्हणशील, 'बंधू, तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे' अरे ढोंग्या, पहिल्याने स्वतःच्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल.
कारण ज्याला वाईट फळ येईल असे कोणतेही चांगले झाड नाही, तसेच ज्याला चांगले फळ येईल असे कोणतेही वाईट झाड नाही. प्रत्येक झाड त्याच्या फळावरून ओळखता येते. काटेरी झाडावरून कोणी अंजीर काढत नाहीत आणि रुद्राक्षाच्या झाडावरून कोणी द्राक्षाचा घड काढत नाहीत. चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो, तसेच वाईट मनुष्य वाईटातून वाईट काढतो; कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: “बाप तसा बेटा”, “खाण तशी माती”, “झाड तसे फळ” ह्या उक्तीनुसार माणूस ज्याप्रकारे जीवन जगतो तशाच प्रकारचे फळ त्याच्या जीवनरूपी झाडाला लागत असते. माणसाच्या जीवनात विचार, शब्द व कृती यामध्ये सुसंगती असेल तर त्याच्या जीवनाला सदाचाराची चांगली फळे लागतात. मात्र या तिन्हींमध्ये विसंगती असेल तर त्याच्या जीवन विकृतींची विषारी फळे लागत असतात.
१. शब्दाचा यथायोग्य वापरः माणसाच्या भाषेवरून त्याची एकंदर जीवनशैली दिसून येते. शब्द संपत्ती, शब्दाचा सुस्पष्ट उच्चार, शब्दाचा यथोचित वापर यावरून त्याचे बुद्धीचातुर्य दिसून येते. एक योग्य शब्द माणसाला जसा कळसाला घेऊन जातो तसाच एक चुकीचा शब्द माणसाला रसातळाला घेऊन जात असतो. आजचे पहिले वाचन आपल्यासमोर शब्दाचे महात्म्य सादर करते. आपल्या जिभेचा योग्य वापर करून व वेळीच मौन राखून माणूस जग जिंकू शकतो कारण शब्द हे चांदीसारखे असतात तर मौन हे सोन्यासारखे असते.
२. विचारांना योग्य दिशाः माणूस जसा विचार करतो तसा तो बनत जातो. माणसाच्या मानात येणाऱ्या विचारांवर माणसाचे नियंत्रण नसले तर जीवनात अंदाधुंदी माजते. चांगल्या व उदात्त विचारांमध्ये व्यक्तीची, समाजाची राष्ट्राची व अखिल जगाची प्रगती साधण्याची क्षमता असते. तर दुर्विचारात वा कुविचारात / अविचारात माणसाच्या अधोगतीचे बीज दडलेले असते. म्हणूनच आपण कसा विचार करतो. त्यावरही विचार होणे गरजेचे आहे. आजच्या दुसऱ्या वाचनात मरणापलीकडचा विचार करण्यात आलेला आहे.
३. कृतीचे योग्य नियोजनः एखाद्या झाडाला कितीही चांगली फळे आली तरी त्या फळांचे पुढे करायचे काय याविषयी जर योग्य नियोजन केले गेले नाही तर तीच फळे वाया जाण्याचा धोका संभवतो. नियोजन शून्य अनेक कृती, “एक ना धड, भाराभर चिंध्या” अशा अवस्थेत माणसाला नेतात. म्हणूनच प्रथम आपल्या डोळ्यातील मुसळ काढण्याची कृती करावी मगच दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ काढण्यास त्यांना हातभार लावावा, असे येशू आजच्या शुभवर्तमानात शिकवितो.
आत्मपरीक्षण : माझ्या जीवनरूपी झाडाला कोणकोणती चांगली फळे येतात? माझे विचार मला योग्य दिशेने कृती करण्यास साहाय्यक ठरतात की अडथळारूप बनतात
प्रार्थना : प्रभू येशू, तुला अनुसरण्यास व तुझ्यासाठी फलदायी जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
0 टिप्पण्या