सामान्यकाळातील सहावा सप्ताह
शनिवार
दि.१९ फेब्रुवारी २०२२
"मनुष्यांपैकी कोणीही जिभेला वश करावयास समर्थ नाही. "
माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळजण शिक्षक होऊ नका, कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हांला माहीत आहे. आपण सगळेच पुष्कळ चुका करतो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीरही कह्यात ठेवण्यास समर्थ आहे. घोड्याने आपल्या कह्यात रहावे म्हणून आपण त्याच्या तोंडात लगाम घातला, तर त्याचे सर्व शरीर आपण फिरवतो. तारवेही पाहा, ती एवढी मोठी असतात आणि प्रंचड वाऱ्याने लोटली जात असतात, तरी सुकाणुदाराची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानशा सुकाणुने फिरवली जातात. तशीच जीभही लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पाहा, लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटवते.जीभ ही आग आहे. ती अनीतीचे भुवन आहे. आपल्या अवयवांत सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे. ती सृष्टीचे चक्र पेटवणारी आणि नरकाने पेटवलेली अशी आहे. श्वापदे, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि समुद्रातील जीव ह्या प्रत्येकाचा स्वभाव मनुष्य स्वभावाला वश होत आहे आणि झाला आहे; परंतु मनुष्यांपैकी कोणीही जिभेला वश करावयास समर्थ नाही ती शांतिरहित असून दुष्ट आहे आणि प्राणघातक विषाने भरलेली आहे. तिच्या योगे, जो प्रभू आणि पिता त्याची आपण स्तुती करतो आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो. एकाच तोंडातून स्तुती आणि शाप निघतात. माझ्या बंधूंनो, ह्या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नयेत.
शुभवर्तमान मार्क ९:२-१३
वाचक :मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"त्यांच्यादेखत येशूचे रुपांतर झाले."
येशूने पेत्र, याकोब आणि योहान ह्यांना आपणाबरोबर एका उंच पर्वतावर एकीकडे नेले आणि तेथे त्यांच्यादेखत त्याचे रूपांतर झाले. त्यांची वस्त्रे चकचकीत आणि इतकी पांढरीशुभ्र झाली की तितकी पांढरी शुभ्र करणे पृथ्वीवरील कोणालाही परिटाला शक्य नव्हते. तेव्हा मोशेसह एलिया त्यांच्या दृष्टीस पडला; ते येशूबरोबर संभाषण करीत होते. तेव्हा पेत्र येशूला म्हणाला, "गुरुजी, आपण येथे आहोत हे चांगले आहे; तर आम्ही तीन मंडप बनवू आपणासाठी एक, मोशेसाठी एक आणि एलियासाठी एक." काय बोलावे हे त्याला सुचले नाही, कारण ते भयभीत झाले होते. तेव्हा एक मेघ आला आणि त्याने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून अशी वाणी झाली, "हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका." मग त्यांनी अकस्मात सभोवती पाहिले तो येशूशिवाय त्यांना आपल्याजवळ आणखी कोणी दिसले नाही.
नंतर ते पर्वतावरून उतरत असता त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली की, “तुम्ही जे पाहिले आहे ते मनुष्याच्या पुत्र मृतावस्थेतून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही कळवू नका." हे बोलणे मनात ठेवून मृतावस्थेतून पुन्हा उठणे म्हणजे काय ह्याविषयी ते एकमेकांना विचारू लागले. मग त्यांनी त्याला विचारले, “पहिल्याने एलिया आला पाहिजे, असे शास्त्री म्हणतात ते कसे ?" त्यांने त्यांना उत्तर दिले, “एलिया पहिल्याने येऊन सर्व काही यथास्थित करतो हे खरे आहे; तर मग मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे सोसावी आणि तुच्छ मानले जावे असे त्याच्याविषयी लिहिले आहे त्याचा अर्थ काय ? तथापि मी तुम्हांला सांगतो, एलिया तर आलाच आहे आणि त्याच्याविषयी लिहिल्याप्रमाणे त्यांना वाटले तसे त्यांनी त्याचे केले."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
✝️
0 टिप्पण्या